मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत निवडणुकीच्या अगोदरच खटके उडालेले संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट केले आहे.
संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. संभाजीराजेंनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।
तुकाराम महाराजांचा हा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट केला आहे. या अभंगाचा अर्थ ‘वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. असा या अभंगाचा अर्थ आहे. हा अभंग ट्वीट करत संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे आहे का? असी देखील चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारुन पक्षाचा उमेदवार उभा केला.
संजय राऊत यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा 42 मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अटी लादत होती हे निकालानंतर सिद्ध झाले आहे.