अकोला : राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अकोलयात काल झालेल्या वादळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. अकोल्यात वादळी पावसामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा ,अकोला या भागात पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. त्यामुळे जवळपास १०० ते १५० हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. यातील काही बागांमधील केळीची काढणी जवळ आली होती काही दिवसात तोडणी करून शेतकऱ्याला हतात त्याची रक्कम मिळाली असती मात्र शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.
केळीच्या दरात घट
बारमाही उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी केळी पिकाची लागवड करतात. मात्र बदलत्या वातावरणामुळे केळी पिकाला फटका बसतो आहे . त्यातच योग्य दर मिळत नसल्यामुळे अनेकांनी केळीच्या बागा उद्धवस्त केल्या. त्यातही आता उरल्या सुरल्या केळीच्या बागांचे वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.