बुध -दिवाळीनंतर तुळशी विवाहाला प्रारंभ झाला असून आता लग्नसराईही सुरू होत आहे. यावर्षी लग्नसराईत चक्क 53 विवाह मुहूर्त असून “शुभमंगल सावधान’साठी यापैकीच एखादा मुहुर्त साधण्यासाठी वर- वधू पित्यांची व लग्नाळू तरुण वर्गाची लगबग सुरू झाली आहे. त्यात मे महिन्यात सर्वाधिक शुभमुहूर्त आहेत. करोनाच्या धास्तीमुळे काढीव तिथीचाही पर्याय निवडला जाणार असल्याची चर्चा आहे.
लग्न म्हणजे एक दिवसाचे सेलिब्रेशन नसून त्यामध्ये संस्काराचा, रितीभातीचा समावेश असल्यामुळे पंचांग पाहून विशिष्ट दिवस व मुहूर्ताची निवड केली जाते. लग्न ठरले की तुळशीच्या लग्नांनंतर लग्न उरकण्यावर भर असतो. परंतु यावर्षी करोनामुळे व लॉकडाऊनमुळे पूर्ण लग्नसराईचा डामडौल दिसला नाही. शासनाने काही नियम व अटी लागू करून 50 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विवाह करण्याची परवानगी दिली. परंतु, त्यामुळे अनेक जण नाराज होतील या कारणामुळे अनेकांनी मागील वर्षी ठरलेले विवाह पुढे ढकलले. तर काही नागरिकांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत घरगुती विवाह उरकून घेतले.
हौसमौज असलेल्या लग्नाळंचूे खोळंबलेले सनई चौघडे तुळशी विवाहानंतर वाजायला सुरुवात झाली. हिवाळ्यामध्ये पुन्हा करोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात असल्याने लवकरात लवकर लग्न उरकून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तुळशीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सर्व मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. अनेकांनी आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार केला असला तरी विवाह समारंभामध्ये मुहूर्त आणि पंचांग याला महत्व असल्यामुळे पालकही लग्नाचे मुहूर्त ठरवत आहेत.
यंदाच्या लग्नसराईमध्ये नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये व नवीन वर्षात 53 मुहूर्त आहेत. मार्च महिन्यात गुरू अस्तामुळे एकही मुहूर्त नाही. गतवर्षीच्या तुलनेत कमी मुहूर्त असल्याने हे मुहूर्त गाठण्यासाठी वधू- वरांच्या पालकांची धावपळ सुरू आहे. विवाहाचा मुहूर्त चुकल्यास काढीव तिथीचाही पर्याय वर- वधूंच्या पालकांकडे खुला असणार आहे. अद्यापही करोनाचे संकट असल्यामुळे आपापल्या सोयीनुसार शुभ दिवसावर लग्न सोहळा पार पाडण्यावर ही अनेकांचा कल राहणार आहे, असे बुध येथील ओंकार जंगम यांनी सांगितले.