मुंबई : राज्यातील पुरपरिस्थिती पाहता आणि टीकेची झोड उठल्यानंतर आता राजकीय यात्रा भाजपा, राष्ट्रवादीकडून थांबवण्यात आल्या. दरम्यान, आता शिवसेनेनेही सर्व राजकीय कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला असून येत्या एक-दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने इथले पुर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. मात्र सत्ताधारी नेत्यांकडून पुरग्रस्त भागाचा दौरा करण्याऐवजी राजकीय कार्यक्रमात यात्रांमध्ये मग्न आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा स्थगित करत कोल्हापूर, सांगलीला येथील पूराची हवाई पाहणी केली. तसेच शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच लोकांच्या मदतीसाठी धावून जा, मदत कार्यात झोकून द्या असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत.