वर्धनगड घाटात कोसळतायत
पुसेगाव – सातारा-पंढरपूर राज्यमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम गेली दीड दोन वर्षे रखडलेल्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी असलेला कच्चा रस्ता चिखलामुळे धोकादायक बनला आहे. एक दोन नव्हे तर गेली सुमारे वीस महिने या रस्त्यावरुन दैनंदिन प्रवास करणारे प्रवाशी या रस्त्यावरील प्रवासाला वैतागले आहेत. वीज मंडळाच्या असहकार्यामुळे अनेक ठिकाणी कमी उंचीवर लटकलेल्या वीज वाहक तारांमुळे रस्त्याची कामे रखडली आहेत. मनमानीपणे काम करणाऱ्या ठेकेदांना जिल्हाप्रशासन आवर घालणार का? अशी विचारणा लोक करु लागले आहेत.
गेल्यावर्षी ऐन पावसाळ्यात संपुर्ण रस्ता उखडल्याने लोकांना चिखलातून धोकादायक प्रवास करावा लागला. धोकादायक रस्त्यावरुन घसरुन अनेक वाहनांचे अपघात घडत असूनही ठेकेदारांकडून रस्त्याची डागडूजी केली जात नाही. नोकरी व व्यवसायानिमित्त या मार्गावरुन दैनंदीन प्रवास करणारे अनेक दुचाकी वाहन चालकांना पाठीच्या मणक्यांचे विकार जडले आहेत. पुलांसाठी खड्डे खणल्यानंतर अनेक ठेकेदार व त्यांचे कर्मचारी पुलाच्या कामासाठी तेथे फिरकलेही नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची कामे आजही अपुर्ण आहेत.
अनेक ठिकाणी पुलालगतचा रस्ता व तेथील बायपासवर साचलेल्या चिखलामुळे रस्ता धोकादायक होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रामोशीवाडी व अन्य काही ठिकाणी अर्धा रस्ता पुर्ण झाला आहे. पण वीज मंडळाने त्या रस्त्यावरील कमी उंचीच्या वीजवाहक तारा हलविण्याबाबत असहकार्य केल्याने तो रस्ताच बंद करण्यात आला आहे.
वर्धनगड घाटात सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत असून घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी जपून प्रवास करण्याची आवश्यकता आहे. वर्धनगड घाटाच्या कामास अजून प्रारंभ झालेला नाही. पुसेगावमध्ये गावातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याकडेही संबंधीचांचे दुर्लक्ष आहे. कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावरुन दररोज प्रवास करणाऱ्या अनेक विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशसासनाने लक्ष घालून रस्त्याच्या कामाला गती द्यावी अशी मागणी होत आहे.