पुणे, दि. 4 -शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरुन पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त आतापर्यंत एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. एकमेकांना पत्रेही पाठवण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडीप्रश्नी पोलीस आणि पालिका यांच्यात बेबनाव असल्याचे समोर आले. ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कान टोचले होते. यामुळे शुक्रवारी हे दोन्ही अधिकारी एकत्रितपणे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. आता दोघांनीही सुरात सूर मिसळत वाहतूक कोंडीचे खापर मेट्रोवर फोडले आहे.
अमिताभ गुप्ता, विक्रम कुमार यांनी शुक्रवारी पाषाण, बाणेर, चतु:शृंगी, सिंहगड रस्त आदी परिसरांतील वाहतूक कोंडीची पाहणी केली. या मार्गांवर मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे, वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्या घटकांचीही त्यांनी पाहणी केली. हे अडथळे तातडीने दूर करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली. दरम्यान, वाहतूक कोंडीस मेट्रोची कामे कारणीभूत असल्याचा निष्कर्ष दोन्ही आयुक्तांनी काढला आहे. आता यावर महामेट्रो प्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहवे लागणार आहे.
…अन् पोलीस आयुक्तांचा पारा चढला
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रो प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. त्याचे काम सुरू आहे. यातच पीएमपी व्यवस्थाही अपुरी आहे. यामुळे खासगी वाहनांच्या संख्या लाखोने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मर्सिडिज बेंझचे सीईओ, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे वाहतूक कोंडीत अडकले होते. तर, चांदणी चौकात दररोज वाहतूक कोंडी व्हायची. मुख्यमंत्रीही त्यात अडकले. तेथील पूल पाडण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांना उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. वाहतूक शाखेचे मनुष्यबळ वाढवण्याबरोबरच स्थानिक पोलीस ठाण्यांचे कर्मचारीही रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरून त्याची बदली वाहतूक शाखेत करण्याची तंबीही देण्यात आली. मात्र, यानंतरही शहरातील वाहतूक कोंडी हटत नव्हती. यामुळे मागील आठवड्यात पोलिसांच्या बैठकीत वाहतूक कोंडीवरुन मोठी शाब्दिक खडाजंगी झाली. पोलीस आयुक्तांचा पारा वाढल्याने त्यांनी थेट वाहतूक उपायुक्तांनाच कारवाईचा इशारा दिला होता.
शहरात अनेक ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांचा मोठा भाग अडवला गेला आहे. इतरही अनेक अडथळे हटवल्यास वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, असे महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले. “बीआरटी’प्रमाणेच सायकल ट्रॅकनेही जागा अडवली आहे. सायकल ट्रॅकचा वापर होत नाही, तो काढून रस्ता रुंदी केल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकते. ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शणास आणून दिली गेली आहे. आता त्यांनी यावर काय उपाययोजना करायचा हा त्यांचा अधिकार आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त