पुणे, दि. 4 -करोना संसर्गामुळे पोलीस शिपाई भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. करोनाच्या काळात गेल्या तीन वर्षांत पोलीस शिपाई भरती होऊ शकली नव्हती. त्यामुळे काही उमेदवारांची वयाची मर्यादा संपली. त्यांच्या कारकिर्दीचा विचार करून हे उमेदवार विशेष बाब म्हणून यापुढच्या पोलीस भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयाचा हजारो उमेदवारांना लाभ होणार आहे.
राज्य सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव तूर्त स्थगित केली आहे. नियोजत वेळापत्रकानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हानिहाय भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. पुन्हा नव्याने जाहिराताची तारीख यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे राज्य पोलीस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावरून टीका होत असतानाच करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्ष पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत होती. त्याची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेशात सुधारणा करीत राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यात करोनामुळे 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा उमेदवारांना यापुढच्या रिक्त पदे भरण्यासाठी एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र ठरविण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाचे वर्यामर्यादा संपलेल्या उमेदवारांकडून स्वागत होत आहे.
नवी जाहिरात कधी येणार?
राज्यभरात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया तूर्तास स्थगित आहे. याच वेळेस वर्यामर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचा या भरती प्रक्रियेसाठी विचार व्हावा, या उद्देशाने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र अधिकृतरीत्या वयोमर्यादा ओलांडलेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी या पदाची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.