हिमांशू
पाऊस आला की रुपेरी पडद्यावर हिरो-हिरॉइनचा रोमान्स सुरू होतो, किंबहुना त्यांचा रोमान्स पाहूनच पाऊस सुरू होतो, हे पाहायला सरावलेल्या आपल्या डोळ्यांना पाऊस आल्हाददायकच वाटतो. तो तसा असतोही; पण काही ठिकाणी तो छातीत धडकी भरवणारा असतो. पावसाचा आवाज ऐकला की लोकांच्या हृदयाची धडधड वाढते.
जसजसा पाऊस वाढत जाईल, तसतशा कपाळावरच्या आठ्या वाढत जातात. घरातले वयोवृद्ध लोक आणि लहानगी मुलं जीव मुठीत धरून बसलेली असतात. तरुण मंडळी वारंवार नदीकाठाजवळून फेरी मारून येतात. पाणी किती वाढलंय, याचा अंदाज ते घेत असतात. पाणी वाढलंच तर काय करायचं, याचं नियोजन घरात सुरू होतं.
चार-पाच घरातले लोक एकत्र येऊन वर्गणी काढतात आणि जवळपासच्या एखाद्या बहुमजली हॉटेलातली वरच्या मजल्यावरची खोली बुक करतात. ज्यांना हेही परवडत नाही ते “यावर्षी आपली सोय कुठं केलीय,’ याची माहिती घेऊ लागतात. काहीजण पाहुण्यांना “आम्ही येतोय,’ असे फोन करू लागतात.
बायाबापड्या घागरी घेऊन नदीवर जातात आणि नदीची ओटी भरतात. “माते, तुझा काठ सोडू नकोस. आमचं घर सुरक्षित ठेव,’ असं गाऱ्हाणं घालतात. तरीही नदी धोक्याची रेषा ओलांडते आणि काळजाचा थरकाप उडवणारा भोंगा वाजतो. “ताबडतोब घरं सोडून अमूक-तमूक ठिकाणी चला,’ अशी सूचना पोलीस ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना देऊ लागतात.
दिवस असो की रात्र, जेवढं हाताला येईल तेवढं साहित्य सोबत घेऊन घर सोडावं लागतं. त्यावेळी घराच्या उंबऱ्याला पाणी लागलेलं असतं. धरणातून किती क्युसेक विसर्ग केला जातोय आणि पाणी कुठपर्यंत चढेल, याचा अंदाज घेत-घेत लोक घराला कुलपं लावत असतात. परत आल्यावर चिखल कुठपर्यंत असेल, घर साफ करायला किती दिवस लागतील, याचा अंदाज निघतानाच घेतात. पाणीपातळीची जी काल्पनिक रेषा मनात धरलेली असते,
त्यापेक्षा अधिक उंचीवर किमती वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कधी-कधी फुगवलेल्या रबरी नावेतून घर सोडावं लागतं. घसा खरवडून रडणाऱ्या लहान पोरांना छातीशी कवटाळून आया पावसात भिजत असतात. त्यांच्या गालावरून ओघळणारे थेंब पावसाचे की अश्रूंचे… कळत नसतं. बाकी काही बरोबर घेतलेलं नसलं तरी वयस्कर लोकांची औषधं आणि भरपूर गरम कपडे घेतलेत ना, याची पुरुष मंडळी मनातल्या मनात उजळणी करत असतात.
नदीपासून दूर कुठल्या तरी शाळा-कॉलेजात थंडीनं कुडकुडणारी शरीरं आणि धास्तावलेली मनं कोंबली जातात. परत गेल्यावर आपलं घर कसं असेल, याचं चित्र कल्पनेनं नव्हे तर अनुभवानंच त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलेलं असतं. अशातच नेतेमंडळी भेटून जातात. हालहवाल विचारतात आणि आश्वासनं देतात.
न्यूज चॅनेलवाले आले तर यावेळी काय बोलायचं, काय मागण्या करायच्या, याचीही रिहर्सल काहीजणांनी मनातल्या मनात केलेली असते. पाणी ओसरल्यावर लोक घरी येतात. दार उघडल्याबरोबर दोन गोष्टी पाहतात. पहिली, किती उंचीपर्यंत स्वच्छता करावी लागणार
आणि दुसरी, कोणकोणत्या चीजवस्तू शिल्लक आहेत… कारण जिथं दरवर्षी पूर, तिथं काही चोरटे ऐन पुरात घरात घुसून मौल्यवान वस्तू लांबवण्याची कला शिकलेले असतात… आता पडद्यावरचा पाऊसही रोमॅंटिक वाटेनासा झालेला असतो.