बारा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती निश्चित करणार
मुंबई, ता. 1 – मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी येत्या शुक्रवारी उत्पादक, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांची बैठक बोलावली असून वाढत्या किमतींना कसा आळा घालावा याबाबत त्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीत 12 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती निश्चित केल्या जातील. आज मुंबईतील साखर, तेलबिया, चहा व तयार मसाल्याचे घाऊक बाजार बंद होते.
विधान परिषदेतील12 आमदारांचे सदस्यत्व स्थगित
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेतील 12 विरोधी सभासदत्व तीन दिवस रद्द करण्याचा आदेश सभापती वि. स. पागे यांनी दिला आहे. सभापतींचा अवमान करणे व कामकाजात अडथळा आणणे ह्या गोष्टी विरोधी आमदारांनी शांतता राखण्याची सूचना करूनही सूचना पाळली नाही
म्हणून सभापतींनी वरील निर्णय घेतला आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद ओळीने तीन दिवस बंद राहण्याचा आजचा तिसरा दिवस होता.
सीमा प्रकरणी आंदोलन करणार
मुंबई – म्हैसूर राज्याबरोबरच्या सीमा प्रश्नांचा लवकरात लवकर निर्णय लागावा म्हणून विरोधीपक्षांनी संयुक्तपणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
सध्याच्या नेतृत्वाला सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता
पुणे – आजचे नेतृत्व ज्या कठीण कालखंडातून आपल्या देशाला पुढे नेत आहे, त्याचा विचार करता आज आपण सर्वांनी एका विचाराने या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री हरिभाऊ गोखले यांनी केले आहे. ते म्हणाले, गेली तीन-चार वर्षे या देशात चैतन्यमय वातावरण तयार झालेले आहे. गरिबांना दिलासा मिळालेला आहे.
देशातील सध्याच्या गतिमान व पुरोगामी नेतृत्वाने हा दिलासा दिलेला आहे. सत्तरच्या दशकाने जी आव्हाने आपल्यासमोर उभी केली आहे ती हसतमुखाने व धीरगंभीरपणाने स्वीकारणारे आजचे आपले राष्ट्रीय नेतृत्व आहे. या नेतृत्वाला साजेसे आपले अनुयायांचे वर्तन नको काय?