सातारा – शासनाने लादलेल्या अशैक्षणिक कामाच्या निषेधार्थ उद्या, दि. 5 रोजी शिक्षक दिनी सर्व प्राथमिक शिक्षक काळ्या फिती लावून अध्यापन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी केले आहे.
खंडाळा येथे झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सरचिटणीस सुभाष ढालपे, ज्येष्ठ नेते बबन ठोंबरे, बॅंकेचे संचालक विजय ढमाळ, सौ. निशा मुळीक, तालुकाध्यक्ष पांडुरंग भरगुडे, भानुदास राऊत, दत्तात्रय महांगरे, रोहिदास कापसे, नारायण सपकाळ, संभाजी कदम, रत्नकांत भोसले, गंगाराम पवार, बाळासाहेब ढमाळ आणि शिक्षक उपस्थित होते.
बलवंत पाटील म्हणाले, नवसाक्षर अभियानाच्या सर्वेक्षणासह अशैक्षणिक व ऑनलाइन कामांना विरोध करण्यासाठी, आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, आमचे आद्यकर्तव्य आम्हाला बजावू द्या, हे शासनाला ठणकावून सांगण्यासाठी शिक्षक दिनासारख्या पवित्र दिनी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याची वेळ प्राथमिक शिक्षकांवर आली आहे. यातून शासनाने बोध घ्यावा आणि अशैक्षणिक कामांचा बोजा दूर करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.शिक्षकांच्या दृष्टीने शिक्षक दिन अत्यंत महत्त्वाचा व पवित्र दिवस असतो.
मात्र, अशैक्षणिक कामांच्या भडीमाराने वैतागलेल्या गुरुजनांसमोर काळ्या फिती लावून अध्यापन करण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवून देण्यासाठी आम्ही गांधीगिरीने हे आंदोलन करत आहोत. निवडणूक, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या शासकीय कर्तव्यपालनात शिक्षक जबाबदारीने काम करतात. मात्र, शिक्षकांना दिवसेंदिवस अतिरिक्त कामांच्या जंजाळात अडकवले जात असल्याने, शिकवण्याच्या मूळ कर्तव्यपालनासाठी त्यांना वेळच मिळत नाही, अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत. ठिकठिकाणचे शिक्षक या आंदोलनात सहभागी होतील आणि काळ्या फिती लावून अध्यापन करतील, असेही बलवंत पाटील म्हणाले.
राजेंद्र बोराटे म्हणाले, अशैक्षणिक कामाने दबलेल्या शिक्षकांना खुल्या वातावरणात शैक्षणिक कर्तव्य बजावता आले पाहिजे. पदवीधर वेतनश्रेणीतील त्रुटी, पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख बढती, वैद्यकीय बिले, फंडाच्या स्लिप वेळेत मिळाव्यात, या मागण्यांसाठीही शिक्षक आता आक्रमक होत आहेत. त्याची सुरुवात शिक्षक दिनाच्या आंदोलनापासून होत आहे. चंद्रकांत यादव, सुभाष ढालपे, बबन ठोंबरे, विजय ढमाळ, सौ. निशा मुळीक यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.