मुंबई :- मुंबईमध्ये अनेक विकासकामे सुरू असून अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. यामुळे लवकरच मुंबईचा कायापालट होणार आहे. पण यामुळे मुंबईच्या भूगर्भात अनेक बदल होताना दिसून येत आहेत. यामुळेच चेंबुरमध्ये आज सकाळी जमीन खचल्याचा प्रकार घडला.
या घटनेत 25 फूट खोल जमीन खचल्याची माहिती मुंबई मनपाकडून देण्यात आलेली आहे. या घटनेमुळे चेंबुरकरांची झोप उडाली असून भविष्यात मुंबईचा “जोशी मठ’ होतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सुमन नगर येथे असलेल्या राहुल नगर नंबर दोनमधील एसआरएस इमारतीसमोरील जमीन बुधवारी सकाळी अचानक खचली.
ही जमीन 25 फूट खोल खचल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 40 ते 50 वाहने खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर रहिवासी राहत असलेल्या इमारतीसमोरील ही जमीन खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.