बंगळुरू :- राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सात षटके गोलंदाजी केल्यावर भारताचा अनुभवी व प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात कधी पुनरागमन करणार या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, बीसीसीआयने त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी स्थानिक क्रिकेट स्पर्धांध्ये खेळण्याची सूचना केली आहे.
अकादमीत बुमराहने सरावाला प्रारंभ केला असून त्याने नेटमध्ये सात षटके गोलंदाजीही केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे बुमराह आशिया करंडक स्पर्धेद्वारे भारतीय संघात पुनरागमन करेल असे म्हटले जात होते. मात्र, बीसीसीआयने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आधी त्याने आपण मॅचफिट असल्याचे स्थानिक स्पर्धांमध्ये खेळून सिद्ध केले पाहिजे तरच त्याचा संघ निवडीसाठी विचार केला जाइल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
यंदाच्या मार्च महिन्यात बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्याने गेल्या महिन्यापासून अकादमीत सरावाला सुरुवात केली. नेटमध्ये तो आता रोज गोलंदाजी करत आहे मात्र, तरीही तो अद्याप मॅचफिट नसल्याचेच अकादमीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
बुमराह पुढील महिन्यात अकादमीत काही सराव सामने खेळणार असून तेव्हा तो किती तंदुरुस्त आहे हे लक्षात येणार आहे. त्याचा संघात समावेश करण्याची कोणतीही घाई केली जाणार नाही, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.
केवळ गोलंदाजीचाच सराव करून चालणार नाही तर त्याला त्याची पूर्ण तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. देशांतर्गत होत असलेल्या काही स्पर्धांमध्येही त्याने सहभागी झाले तरी त्याला आत्मविश्वास येइल व तो लवकरात लवकर तंदुरुस्त ठरेल, असा विश्वासही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.
राहुलबाबत आशा मात्र, अय्यर अद्याप अनफीटच..
अकादमीत तंदुरुस्तीसाठी दाखल झालेल्या लोकेश राहुलने चांगली प्रगती केली आहे. तो नेटमध्ये फलंदाजी व क्षेत्ररक्षणाचाही सातत्याने सराव करत आहे. त्याची प्रगती पाहता तो भारतीय संघात निश्चितच पुनरागमन करेल मात्र, श्रेयस अय्यरला इतक्यात संघात पुनरागमन करणे शक्य होणार नाही, असेही अकादमीच्या सूत्रांनी सांगितले आहे. अय्यरची दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी आमखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.