मुंबई – अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेतच दोन गट निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांच्या समावेश असल्याची माहिती आहे.
“आम्ही सुद्धा बंड केले असून, ज्यांना मंत्रीपद देण्यात आली त्यांचे मंत्रीपदा काढा,’ अशी मागणी इतर आमदारांनी केल्याची माहिती आहे. शिंदे गटात मंत्री असलेले आमदार आणि मंत्री नसलेले आमदार असे दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. तसेच पक्षात नाराजी आहे असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील कबूल केले आहे.
राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असतानाच रविवारी अचानक अजित पवारांनी आपल्या 9 आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेऊन, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्यालाही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा लावून असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झाला आहे.
सत्तेत आणखी एक पक्ष वाटेदार झाल्याने मंत्री नसलेल्या आमदारांमध्ये नाराजी आहे. तर पक्षाच्या बैठकीत मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसलेल्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी मंत्री झालेल्या लोकांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी देखील आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती आहे.