नागरिकांची ससेहोलपट थांबणार; दैनिक “प्रभात’च्या वृत्ताची दखल
पुणे – अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या पासकरता करावी लागणारी धावपळ आता थांबणार असून, त्यासाठी ऑनलाइन पासची सुविधा करण्यात आली आहे. याची अंतिम चाचणी पूर्ण झाली असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. उपायुक्त आणि विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी या संदर्भात माहिती दिली. अंत्यसंस्कार पास मिळवण्यासाठी नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात दैनिक “प्रभात’ने वृत्त दिले होते.
शहरातील कुठल्याही रुग्णालयामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच हॉस्पिटलमधून महापालिकेच्या “पीएमसी केअर’ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करून हा पास घेता येणार आहे.
पुण्याची लोकसंख्या सुमारे 40 लाख इतकी आहे. दर महिन्याला शहरात सुमारे सव्वादोन हजार नागरिक मरण पावतात. विविध धार्मिक रिवांजांनुसार जवळपास प्रत्येक भागांत स्मशान आणि दफनभूमी आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्यविधी पास महत्त्वाचा असतो. पालिका रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, ससून आणि विश्रामबागवाडा येथे पासेस देण्याची व्यवस्था आहे.
परंतु, काही कार्यालये संध्याकाळी बंद झाल्यानंतर बरेचदा तेथे कर्मचारी नसल्याने नागरिकांना अगदी उपनगरांतून विश्रामबागवाडा किंवा ससून रुग्णालयात जावे लागते. वैकुंठ स्मशानभूमीतील पासेस मिळण्याची सोयही रात्री साडेनऊपर्यंतच आहे. त्यामुळे त्याची माहिती अनेकदा मयतांच्या नातेवाईकांना नसते. अशा परिस्थितीत ऐनवेळी कुटुंबात अघटित घटना घडली तर पास कोठे मिळतात येथून अनेकांना माहिती घ्यावी लागते.
पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये संगणक बसवले आहेत. याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये भरलेला फॉर्म, फॉर्म क्रमांक आणि अन्य तपशील पाहता येणार आहे. तसेच अन्य ठिकाणच्या स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्येही कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पास पाहता येतील, अशी सुविधा केल्याचे कंदूल यांनी सांगितले.
बरेचदा ज्येष्ठ नागरिक आणि काही व्याधींनी त्रस्त असणाऱ्यांचा घरीच मृत्यू होतो. सद्य:स्थितीत नगरसेवकांच्या पत्रावरून अशा व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांसाठी पासेस दिले जातात. परंतु, ऑनलाइन पासेससाठी नगरसेवकांचे पत्र अथवा डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज भरताना स्कॅन करून जोडण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे कंदूल म्हणाले.
जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळणार!
शहरात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर जवळपास 15 मार्चपासून शहरातील जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालयात काम ठप्प झाले आहे. यामुळे मागील सुमारे दोन महिन्यांत शहरात किती जन्म आणि मृत्यू झाले याची एकत्रित आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध होत नाही. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार रुग्णालये अथवा स्मशानभूमी, दफनभूमींकडून दिल्या जाणाऱ्या मयत पासेसची माहिती आल्यानंतर त्याची कसब्यातील जन्म-मृत्यू कार्यालयात नोंद होते. याला बराच कालावधी लागतो. त्यामुळे जन्म – मृत्यूचा दाखलाही 21 दिवसांनंतर मिळतो. ऑनलाइन नोंदणी झाल्यास हा कालावधी कमी होऊन जन्म-मृत्यू दाखले कमी वेळात उपलब्ध होऊ शकणार आहेत.
मृत्यूंच्या नोंदणीचे कामही सुलभ
ऑनलाइन मयत पासेसमुळे नागरिकांची विनाकारण ससेहोलपट थांबण्यास मदत होणार आहेच, त्याचबरोबर महापालिकेकडील मृत्यूंच्या नोंदणीचे कामही सुलभ होणार असून, मृत्यूचे दाखले देण्यास लागणारा 21 दिवसांचा कालावधीही कमी होणार आहे, असेही कंदूल यांनी नमूद केले.