पुणे शहर सर्वाधिक १४ हजार तर अकोल्यात सर्वात कमी ७२ गुन्हे
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२,१६१ गुन्हे दाखल झाले असून १८,२१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात (१४,७५२) झाली असून सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (७२), रत्नागिरी (७५) जिल्ह्यात आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख (३ कोटी ३२ लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३,२९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. व ५१,८७४ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.