पुरंदर: तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या बाजारात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे दूध व्यवसायिक मोठे अडचणीत सापडला आहेत.
लॉकडाऊन मुळे शेतक-यांच्या कोणत्याही शेतमालासह बाजारभाव मिळत नसल्याने, आगोदरच चिंतेत असलेल्या शेतक-याला, जोडधंदा असलेल्या दुध व्यवसायालाही देशांमध्ये असलेल्या लॉकडाऊन मुळे दुधाचा खप नसल्याने बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीत जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीचालक २० ते २४ रुपये प्रतिलिटर इतका नीचांकी भाव देत आहेत. या रकमेतून मूलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दुधाला साधारण ३० ते ३५ रुपये बाजारभाव मिळत होता. मात्र ग्राहकांना आजही पूर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे.
त्यातच शेंगदाणा पेंड अडीच हजार रुपये, सुग्रास नंदन (६०किलो) १३४५ रूपये, हिदुस्थान- १३६५ रुपये ,रत्ना ५० किलो. १२५५ भुसा- बाराशे रुपये, सरकी पेंड २००० पासून पुढे,असे पशुखाद्याचे भाव आहेत. दुधाचे बाजारभाव जरी कमी झाले असलेतरी, पशुखाद्याचे बाजार भाव माञ थोड्याप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात रुतत चालला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने मागील काही वर्षांमध्ये परिसरामध्ये छावणीही सुरू केली होती. माञ मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने या वर्षी छावणी सुरू करण्याबाबत मागणी झाली नाही.
वाल्हे परिसरामध्ये पावसामुळे ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने, यावर्षीही वैरण (ज्वारीचा कडबा) बाजार भाव शेकडा २५०० पासून ते शेकडा ४५०० पर्यंत जाऊन पोहचले. पाऊस जास्तकाळ सुरू राहिल्याने हिरवा चारा अतिवृष्टीमुळे शेतामध्येच कुजून गेला. दिवाळी नंतर साखर कारखाने सुरू झाल्यावर ऊसाचे वाडे ५०० रूपये शेकडा मिळत होते. आत्ता ऊस तोडणी बंद झाल्याने, व हिरवा चारा उपलब्ध नसल्याने, गोठ्यामध्ये गाय असूनही शेतकरी दुधाचे बाजार भाव, व हिरव्या चा-यांची कमतरता यामुळे शेतकरीवर्ग येणा-या पुढील काळामध्ये दुध व्यवसायाला बगल देण्याच्या मनस्थितीत आहेत.