नवी दिल्ली – देशभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक छोटे-मोठ्या उद्योगधंद्यांना टाळे लागले आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात अर्थव्यवस्थेसाठी असणारी आव्हाने आणि त्याचे नियोजन कसे करावे, यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केली आहे.
रघुराम राजन म्हणाले कि, करोना व्हायरसशी लढण्यासोबतच नागरिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करायला पाहिजे. गरिबांना मदत करणं आवश्यक आहे यासाठी सरकारनं साधारण ६५ हजार कोटी रुपये मदत द्यायला हवी. आपली अर्थव्यवस्था २०० लाख कोटींपेक्षा जास्त आहे आणि त्यावर आपण ६५ हजार कोटी रुपयांचा भार देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील करोनाच्या तपासणीच्या संख्येच्या विषयावर रघुराम राजन म्हणाले की, अमेरिकेत दररोज सरासरी १ लाख ५० हजार तपासण्या केल्या जातात. तर भारतात केवळ दररोज २०-२५ हजार चाचण्या होतात. तज्ज्ञांच्या मते, पाच लाख लोकांची चाचणी झाल्या पाहिजेत.
जागतिक अर्थव्यवस्थेबाबत बोलताना राजन म्हणाले, भारत या संधीचा फायदा घेऊ शकेल. उद्योग आणि पुरवठा चेनमध्ये आपल्याला विशेष स्थान मिळविण्याची संधी आहे. लॉकडाउन जास्त काळ सुरू राहणे शक्य नाही. आपल्याकडे इतर देशांप्रमाणे अर्थव्यवस्था मजबूत नसल्यानं आपल्याला खरेदी-विक्री-आयत-निर्यातीसाठी खुली करावी लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.