महापालिका प्रशासनाचा दावा
पुणे – खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता यंदाच्या उन्हाळ्यात शहराला फारशी पाणी टंचाई भासणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे 43 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यातही पुणेकरांना नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी, गेल्या उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ओढवले होते, ते यंदा ओढवणार नसून पाणी कपातीची टांगती तलवारही नसणार आहे.
करोनामुळे शहर लॉकडाऊन आहे. यामुळे पाण्याचा वापर तुलनेत कमी झाला आहे. याशिवाय उद्योगही बंद असल्याने पाण्याची बचत झाली असून, परप्रांतिय मजूर, कामगार वर्गही त्यांच्या गावी गेल्याने पाण्याचा वापरही बराच कमी झाला आहे. त्यामुळे जलाशयातील साठा टिकून आहे. सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 12.97 टीएमसी पाणी आहे. प्रतिमहा सव्वा टीएमसीच्या हिशेबाने शिल्लक साठ्यात शहराला आठ ते दहा महिने पाणीपुरवठा होऊ शकेल.