पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य महाराष्ट्र चांगला तापला असून, सोमवारी (दि. 29) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक मालेगाव येथे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाचा उन्हाळा विदर्भापेक्षा मध्य महाराष्ट्रातच अधिक जाणवत असून, मार्च महिन्यापासून मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर आणि पुणे जिल्हा तापलेला आहे.
पुढील आठडाभर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. परिणामी, उष्ण व दमट वातावरण असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार असल्याने “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उकाडा जास्त जाणवेल. त्यामुळे या जिल्ह्यांनाही हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील काही प्रमुख भागातील कमाल तापमान
मालेगाव – 44, जळगाव – 43.4, सोलापूर – 42.9, नांदेड – 42.8, लोहगाव – 42.5, अकोला – 42.3, बीड आणि ब्रह्मपुरी – 42, पुणे आणि चंद्रपूर – 41.8, छत्रपती संभाजीनगर – 41.4, यवतमाळ – 41.2, सांगली आणि वर्धा – 41, बुलढाणा – 40.4, परभणी – 40.8, सातारा – 40.7, अहमदनगर – 40.2, नागपूर 40.1 अंश से.