मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता विळखा पाहता नियम आणखी कठोर करण्यात येत आहे. मुंबई आणि पुण्यात परिस्थिती गंभीर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असेही स्पष्ट केले.
केंद्राच्या सूचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर करोनावर आपण मात करू शकू. तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाउनचा कालावधी नाईलाजाने ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आकडा आपण शून्यावर आणणारचं या आवाहनाला आपल्याला सामोरे जायचंय,” असेही त्यांनी नमूद केले. “सोशल डिस्टन्सिंगच्या सुचना आपण पाळल्या पाहिजेत. दोन लोकांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आपण करोनाचा संसर्ग रोखू शकतो. लोकांनी काळजी घेतली तर काही ठिकाणी यातून शिथिलता शक्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“अमेरिकेसारख्या देशातही आज मृत्यू झालेल्यांची संख्या ४० हजारांच्या वर आहे. स्पेनमध्येही ही संख्या २० हजारांवर तर फ्रान्समध्येही ही संख्या १९ हजारांच्या वर आहेत. काही देश पाहिले तर त्यांचा आकार महाराष्ट्राएवढा आहे. त्या ठिकाणची मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. आपल्याला पाश्चिमात्य देशांची तुलना करून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील,” असंही शरद पवार म्हणाले.