पुणे – खडकवासला धरणसाखळीतील पाणी वेगाने कमी होत असून, उन्हाची तीव्रता पाहता, धरणात सध्याचे पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आहे. त्यामुळे हे सर्व पाणी शहर आणि जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी सजग नागरीक मंचाने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जलसंपदा विभागाकडून मे महिन्यात जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास मे महिन्यातच पुण्यात मोठी पाणी कपात करावी लागण्याची भीती आहे. सजग नागरिक मंचाने दिलेल्या पत्रानुसार, “खडकवासला धरणात आजअखेर ९.४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर शहरात जून कोरडाच जात असून, जुलैमध्येच पाऊस होतो.
शहराला सध्या प्रत्येक महिन्याला १.६ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर शिल्लक पाणीसाठा पाहता शहरासाठी ३१ जुलैपर्यंत ५.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका पाहता पुढील तीन महिन्यांत किमान १.२५-१.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. जूनअखेरीस जिल्ह्यात पालखी सोहळा असून, त्यासाठी अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागेल.
त्यामुळे शहरासाठी पिण्याचे पाणी, बाष्पीभवन आणि पालखी सोहळा लक्षात घेता शहरासाठी ७.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर मे अखेर दौंडसह धरणातून काही गावांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी दीड टीएमसी पाण्याची आवश्यकता असेल. त्यामुळे सध्या असलेले पाणी केवळ शहर तसेच जिल्ह्यात पिण्यासाठी ठेवणे संयुक्त होणार आहे.’
निर्णय कोण घेणार ?
आगामी आवर्तनातून खडकवासला धरणाचे पाणी दौंड आणि इंदापूर तालुक्यांत जाणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार हा निर्णय घेतील का, असा प्रश्न आहे. तर, दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणी नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतरच पाण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तो पर्यंत धरणसाठा कमालीचा घटण्याची भीती आहे.