पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरणातून वारजे आणि नवीन पर्वती जलकेंद्राला जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण, तेथील वीजपुरवठा सोमवारी तब्बल साडेपाच तास खंडीत झाला. त्याचा फटका शहराच्या अर्ध्यापेक्षा जास्त भागाला बसला. सोमवारी दिवसभर अनेक भागांत पाणी आलेच नाही. ज्या भागात उशिराने पाणी आले, तेथे अतिशय कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणी देण्यात आले.
सकाळी साडेअकरा वाजता हा वीज पुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी चार वाजेनंतर तो सुरळीत झाला. प्रामुख्याने लष्कर जलकेंद्रातून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या पूर्व भाग तसेच वारजे आणि पर्वती जलकेंद्रातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाला सर्वाधिक फटका बसला. खडकवासला रॉ वॉटर जॅकवेल पंपिंग येथील महावितरणच्या वीज खांबाला सकाळी सव्वाअकाराच्या सुमारास कारने धडक दिली.
त्यामुळे हा पोल पडला. त्यामुळे विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड होऊन येथील पंप बंद पडले. माहिती मिळताच महावितरणने खांब उभारण्यासह वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. मात्र, वारजे जलकेंद्राचा पंप सुरू होण्यास चार वाजले. तर साडेचार वाजता पर्वती जलकेंद्राचे पंप सुरू झाले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा पाणी घेण्यास सुरूवात केली. तर टाक्यांमध्ये आवश्यक पाणी आणि पुढील प्रक्रिया करण्यासह सहा वाजेपर्यंत वेळ गेला. परिणामी, दुपारचे पाण्याचे सर्व वेळापत्रक कोलमडले.
टॅंकरवर भिस्त
दिवसभर पाणी न आलेल्या परिसरांना सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, अचानक पाणी न आल्याने तसेच उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव झाली. तसेच मोठ्या सोसायटींना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागला.
या भागांना फटका…
वारजे जलशुद्धीकरण केंद्र : हद्दीतील संपूर्ण कोथरूड, वारजे-माळवाडी, बाणेर, बालेवाडी, बावधन व पाषाण परिसर, कर्वे रस्ता परिसर, चतु:शृंगी, औंध, गणेशखिंड, शिवाजीनगर, गोखलेनगर, प्रभात रस्ता भागांतील पाणीपुरवठा बंद होता.