पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वप्न अपूर्ण राहिलेला आत्मा भटकत राहतो. महाराष्ट्र अशाच भटक्या आत्म्याचा शिकार झालेले राज्य आहे. येथील एका मोठ्या नेत्याने स्वार्थासाठी ४५ वर्षांपूर्वी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत गेला. तो आत्मा केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही, तर आपल्या स्वत:च्या कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता सोमवारी केली.
पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी आयोजित जाहीर प्रचार सभेला मोदी यांनी संबोधित केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा. मेधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे; पण देशाला स्थिर सरकार हवे आहे. महायुती २५ वर्षांच्या उणिवा भरून काढेल. भाजप एनडीए सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
…तर मोदी घरात घुसून मारेल
शेजारून दहशतवादी पाठवणाऱ्यांना आता पीठही मिळेनासे झाले आहे. हा मोदी आहे. तो घरात घुसून मारेल, अशा शब्दांत पाकिस्तानचे नाव न घेता मोदी यांनी सज्जड दम दिला. याशिवाय पीएफआयवर बंदी घातली, त्यांचे तीस मार खाँ जेलमध्ये आहेत.
काँग्रेसने भगव्याला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, पुस्तके छापली. शतकानुशतकांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता आमच्यात आहे. ५०० वर्षांपासून प्रलंबित राम मंदिर केले, याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले. इतकी वर्षे काँग्रेसने देशाची दिशाभूल केली. मात्र, आता देश स्वप्न आणि संकल्प घेऊन चालतो, असे मोदी म्हणाले.
घटनेत मिळालेले आरक्षण मुसलमानांना देण्याचा घाट घालत आहेत. मुसलमानांना आरक्षण देण्याचे कर्नाटक मॉडेल केले आहे, त्यांना न्यायालयाने फटकारले. एका रात्रीत मुसलमानांना ओबीसी करून २७ टक्के ओबीसी आरक्षण दिले. मोदी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही. असे करणाऱ्यांना राजकीय नकाशावरून संपवणार आहे, असा इशाराही मोदी यांनी दिला.
पीएम मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– या भूमीने अनेक समाजसुधारक देशाला दिले. आज ही भूमी जगाला संशोधक देत आहे.
– पुणे जेवढे प्राचीन आहे, तेवढे भविष्याकडे वाटचाल करणारे आहे. पुणे तिथे काय उणे.
– काँग्रेसने देशात 60 वर्षे राज्य केले; पण त्यांनी मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आम्ही त्या १० वर्षांत दिल्या.
– मोदी यांची गॅरंटी आहे देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास कराल
– काँग्रेसने मनमोहन सिंग रिमोट कंट्रोल सरकार काळात दहा वर्षांत जे पैसे मूलभूत गरजांवर खर्च केले, ते आम्ही एक वर्षात करत आहे.
– स्टार्टअप इंडियामध्ये युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहे. त्यातील अनेक पुण्यात आहेत.
– रीफॉर्म , ट्रान्सफॉर्म, परफॉर्म यावर भर दिला आहे.
– देश जगात आपली ताकद दाखवून देत आहे. सर्वाधिक पेटंट आपले युवक नोंदणी करत आहेत.
– दहा वर्षांपूर्वी मोबाईल आयात करत होतो; पण आता आपण जगात दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत.