सातारा – देशाला “एनआरसी’ची गरज नाही. “सीएए’ हा धर्माधर्मात फूट पाडणारा कायदा आहे. याविरोधात देशातील सर्व समाजाला बरोबर घेऊन यापुढे संघर्ष करणार आहोत, असे प्रतिपादन “हम भारत के लोग’चे निमंत्रक योगेंद्र यादव (नवी दिल्ली) यांनी सातारा येथे केले.
एनआरसी, एनपीआर, सीएए विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या बाराव्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी योगेंद्र यादव आले होते. त्यांच्यासमवेत “दक्षिणायन’चे निमंत्रक डॉ. गणेश देवी, सुभाष वारे, डॉ. सुरेखा देवी उपस्थित होते.
यादव म्हणाले, देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केंद्र सरकारच्यावतीने सुरू आहे. ते आम्ही सहन करणार नाही. डॉ. गणेश देवी म्हणाले, “हम भारत के लोग’ संघटनेच्यावतीने आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून एनआरसी, एनपीआर व सीएएला आमचा विरोध का आहे, ते सांगण्यासाठी वेळ मागितली आहे.
देशातील महिला रस्त्यावर आल्या आहेत. ही महिलाशक्तीच केंद्रातील सरकारला पाडेल व एनआरसी येऊ देणार नाही. यावेळी सुभाष वारे यांचे भाषण झाले. विजय मांडके व मिनाज सय्यद यांनी नियोजन केले. आज दिवसभर एनआरसी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.