रावणगाव – दौंड तालुक्यातील मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या भागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची काढणी जोरात सुरू आहे. सध्या या भागात ज्वारीला दाणे न भरल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. परंतु सद्या ज्वारी काढणीसाठी येणाऱ्या खर्चातही वाढ होत असल्यामुळे शेती करणे म्हणजे लाखाचे बारा हजार अशी व्यथा शेतकऱ्यांची होऊन बसली आहे.
पावसावर अवलंबून असलेला जुगार
जिल्ह्यात प्रामुख्याने बागायती पिके घेतली जातात. यात प्रामुख्याने ऊस, फळबागा, गहू , मका अशी पिके घेतात. तर काही भागामध्ये वर्षाकाठी खरीप व रब्बी हे दोन हंगाम आपल्या शेतावर घेऊन वर्षाकाठी लागणारा खर्च या उत्पादनातून भागवणे एवढाच उद्देश या भागातील शेतकऱ्यांचा असतो. काही शेतकऱ्यांकडे पशूधन असल्याने उत्पन्न नाही मिळाले तरी जनावरांचा चारा मिळेल, या हेतूने ज्वारी पेरणी केली जाते. एकतर शेती म्हणजे पावसावर अवलंबून असलेला जुगार. पाऊस पडला तर मटका लागला नाहीतर पाण्यात गेला.
काळ्या आईनेच दगा दिल्यामुळे, सतत बदलत असलेले हवामान व सतत वाढत असलेल्या मजुरी व मजूर टंचाईमुळे बळीराजाही चिंताग्रस्त झाला आहे. सततचा दुष्काळ विचारात घेता यावर्षी उत्तम प्रकारचा परतीचा पाऊस झाला आहे, त्यामुुळे पाणीटंचाई जाणवणार नाही.विहिरी, नदी, नाले यांना बऱ्यापैकी पाण्याची साठवण झाली. असे असताना यावर्षी ज्वारीचे उत्तम पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना ज्वारीची पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला.
ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या चिपाडांची वाढ झाली मात्र, कणसामध्ये दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अवकाळी पाऊस पडल्यामुळे उभे पीक पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही लालसर स्वरूपाची तयार झाली. असे असताना शेतातील ज्वारीचे पीक काढले तर पाहिजे. या उद्देशाने आज शेतकरी आपल्या शेतावरील सुगी करत असताना सध्या दिवसाकाठी ज्वारी काढण्यासाठी पुरूष मजूर पाचशे रूपये, तर स्त्री मजूर साडेतीनशे रूपये दिवसाची मजुरी मागत आहेत.
शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने नातेवाईक, पाहुणे यांना बोलावून ज्वारी काढली जाते, तर काही शेतकरी सावड पद्धतीने एकमेकांच्या शेतातील ज्वारी काढताना दिसत आहेत. शासनाकडून सोयाबीन, तूर, कापूस अशा पिकांना हमीभाव दिला जातो. तशा पध्दतीने संपूर्ण पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.
या वर्षी सतत हवामानात बदल झाल्यामुळे ज्वारीची वाढ चांगली झालेली नाही. खराब हवामानामुळे ज्वारीवर चिकटा रोग पडल्याने अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळणार नाही. चिकटा पडल्यामुळे मालाला सुध्दा चांगला बाजारभाव भेटतो की नाही याची चिंता आहे, त्यातच उत्पादन व इतर खर्च वाढत गेल्याने शेतकऱ्यांना ज्वारी पीक परडवत नाही.
-महेश बोराटे, प्रगतीशील शेतकरी मळद.
ज्या शेतकऱ्यांनी आगाप ज्वारी पीके घेतली होती. त्या पिकावर खराब हवामानामुळे चिकटा रोग पडल्याने येणारा माल हा आकाराने लहान, लालसर व कमी प्रतीचा आहे. या मालाची आवक जास्त असेल तर कोरडवाहू, घाटामाथ्यावर पिकवलेली मागास पेरणी केलेली ज्वारीची आवक कमी असेल, परंतू तो माल पांढरा शुभ्र व टपोरा असल्याने त्याला चांगला बाजारभाव मिळेल. ज्वारीचे भाव प्रति किंवटल 2 हजार 500 रूपयांपासून 3 हजार 600 रुपयांपर्यंत राहील असा अंदाज आहे.
– वैभव शिंदे, आडत व्यापारी.