जुनागढ – गुजरातच्या जुनागढ येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या अर्थात सीएएच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. कॉंग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे.
जे लोक आपल्या शेजारी देशात राहतात त्यांचा केवळ एकच दोष आहे की ते हिंदू, जैन, बौध्द, ख्रिश्चन आणि पारसी आहेत. ते त्या धर्माला मानतात आणि त्यामुळे त्यांच्यावर तेथे अत्याचार केले जातात.
त्यांना तेथून हुसकावून लावले जाते आणि त्यांना केवळ भारताचा आसरा असतो. ते कुठे जातील? मी त्यांच्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायदा तयार केला. मात्र ते (कॉंग्रेस) म्हणतात की आम्ही हा कायदाही रद्द करू.
मात्र मी त्यांना आव्हान देतो की ते पुन्हा कलम ३७० आणू शकणार नाहीत आणि सीएए रद्द करू शकणार नाहीत अशा शब्दांत पंतप्रधानांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले.
आपल्या भाषणात मोदी पुढे म्हणाले की कॉंग्रेसच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे की रामाला हरवणे आमचे लक्ष्य आहे. शिव आणि राम यांना पराभूत करण्याच्या गोष्टी ते करतात. त्यांनी ही निवडणूक प्रभू रामाच्या विरोधातील मोहीम बनवली आहे.
प्रभू रामाला हरवून कोण जिंकले आहे? याच विचारसरणीतून मुघलांनी रामाचे मंदिर पाडले होते. त्यांनी सोरटी सोमनाथाचे मंदिर पाडले. ही निवडणूक कॉंग्रेससाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.