मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शवला आहे. तर राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात त्यांनी केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला. मात्र, संपूर्ण देशभरात या कायद्याला विरोध होत आहे. याविरोधात अनेक संघटना आंदोलन करत आहेत. तर, विरोधी पक्षांनीही या कायद्याला विरोध केला आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप या विषयावर मौन बाळगले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे या कायद्याला राज्यात लागू होऊ देणार की नाही, याबाबत संभ्रम होता. आता उद्धव ठाकरे यांनी सीएए कायद्याबाबत आपले मत स्पष्ट करत हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचे संकेत दिले आहेत.