हिंदू मुलींच्या अपहरणावरून पाकिस्तानला भारताने सुनावले खडेबोल
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पाकमध्ये सध्याच्या घडीला घडणाऱ्या हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्या होत्या. भारताकडून या घटनेसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समज देण्यात असून या घटनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हा विषय गंभीर असून यावर लवकरात लवकर हालचाली करत अपहरणकर्त्या मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याची मागणी देखील करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, शांती मेघवाड आणि सरमी मेघवाड या दोन अल्पवयीन मुलींचे पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आले होते.
दोन्ही मुली या पाकमधील थरपारकर जिल्ह्यातील उमर गावच्या रहिवाशी आहेत. या ठिकाणी हिंदूची समाजातील वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. 14 जानेवारीला या मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. याशिवाय जकोबाबाद या जिल्हातील महक नावाच्या अल्पवयीन मुलीचे 15 जानेवारीला अपहरण करण्यात आले होते.
पाकिस्तानमधील या घटनेमुळे भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारताने या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहचवावे अशी मागणी पाकला केली आहे. गेल्या काही दिवासांपासून पाकिस्तानमध्ये हिंदू महिलांचे अपहरण करुन त्यांच्यासोबत जबरदस्तीने विवाह करण्याचा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुधारित नागरिकत्व कायदाही लागू केला आहे. यावरुनही देशात संतप्त वातावरण पाहायला मिळाले आहे. या कायद्याचे समर्थन करताना पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचर होत असल्याचा उल्लेख अनेकदा केला आहे.