मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या शिष्टाईला यश आल्याचे मानण्यात येत आहे. राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. यानुसार उद्याच देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच अजित पवारांच्या राजीनाम्याने भाजपाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा राज्यपालांकडे सोपविल्याची माहिती मिळत आहे. यानंतर फडणवीस आज ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
महाविकासआघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वीच अजित पवारांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपच्या सत्तास्थापनेनंतर अजित पवारांचे मन वळवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंसह सदानंद सुळे आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक दिगज्ज नेत्यांनी प्रयत्न केले होते. तसेच भाजपविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत कोणताही विलंब न करता उद्याच पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. व बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.