पिंपरी, (प्रतिनिधी) – वाळवंटातील उष्ण वातावरणाशी जुळवून घेत, वेगाने धावणार्या उंटाला पोटापाण्यासाठी आता उद्योगनगरीकडे धाव घ्यावी लागत आहे. एप्रिल व मे महिन्यात असलेल्या महापुरुषांच्या जयंत्या, लग्न समारंभ व शोभायात्रांकरिता उंटांना मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून उद्योगनगरी व परिसरात या व्यावसायिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वर्षभर उंटांचा सांभाळ करणार्या व्यावसायिकांचा उन्हाळ्यातील पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील वयाच्या साठीकडे झुकलेले उंट व्यावसायिक दत्तू खरात यांचा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील लग्नसोहळे , शोभा यात्रा व मिरवणुकांमध्ये होणार्या उंटांच्या व्यवसायाचा चांगला अभ्यास झाला आहे. त्यामुळे वर्षभराची बेगमी पदारात पाडून घेण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव व एप्रिल मे महिन्यातील महापुरुषांच्या जयंतींमुळे या कालावधीत खरात व त्यांच्या कुटुंबियांचे उद्योगनगरी व परिसरात ओळखीच्या नागरिकांजवळ वास्तव्य असते.
दत्तू खरात यांच्या वडीलांनी हा व्यवसाय सुरू केला होता. आता दत्तू यांचा मुलगादेखील या व्यवसायात उतरल्याने खरात कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात उतरली आहे. वर्षभर श्रीगोंद्यात वास्तव्य असताना शेती व किरकोळ कामे करून खरात कुटुंबीय त्यांची गुजराण करतात. तर आर्थिक कमाईकरिता उंटांची खरेदी थेट राजस्थानमधून केली जात असल्याची माहिती दत्तू खरात यांनी दिली.
राजस्थानमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून, उंटांची निवड केली जाते. त्यामध्ये नर मादी जोडीचा समावेश असतो. निवड केलेले उंट संबंधित व्यापार्याकडून रस्ते वाहतूकमार्गे थेट नाशिकफाटा येथे पोचविले जातात.
एका उंटाच्या शोभायात्रेतील सहभागाला मंडळाच्या आर्थिक पतनुसार बिदागी दिली जाते. मग ती पाच हजारांपासुन सुरू होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात तसेच एप्रिल मे महिन्यातील महापुरुषांच्या जयंत्या व लग्न मुहूर्तांदरम्यान सार्वाधिक मागणी असल्याने या कालावधीत आमचे पिंपरी-चिंचवड व पुणे भागात वास्तव्य असते – दत्तू खरात उंट व्यावसायिक