मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापणेचा पेच काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचं सरकार येणार का? हा प्रश्न ही कायम आहे.
यातच सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे नेते आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेणार आहेत. याशिवाय, सरकार स्थापनेच्या दृष्टीनं आज अनेक बैठका अपेक्षित आहेत.
आपलं सरकार येतंय, चिंता करू नका – उद्धव ठाकरे
तत्पूर्वी, राज्यात आपले सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आत्महत्यांचा विचारही मनात आणू नका. पावसाळ्यातील महापूर आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले असले तरी हेक्टरी 25 हजार रुपये भरपाई दिली जाईल. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सातारात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी दरम्यान केले होते.