पुणे – शहरात २५ सप्टेंबरला अनेक भागात जोरदार पावसाचा तडाखा बसला होता. या पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला होता. त्या घटनेेला दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊऩ गेला मात्र, अजूनही या पूरग्रस्त लोकांना सरकारची मदत मिळालेली नाही, यासाठीच आज आंबिलाओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त नुकसान भरपाई , पंचनामे, थकीत नुकसानभरपाईकरता हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: आंबिल ओढय़ाला आलेल्या पुरामुळे मोठय़ा प्रमाणावर वाताहत आणि जीवितहानी झाली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच पुराचा फटका भूमिगत वाहिन्यांनाही बसल्याचे पुढे आले आहे.
सायकल, मोटारसायकल, रिक्षा, हातगाडी, टपरी, किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, या मागणीसाठी आंबिलओढा परिसर पूरग्रस्त संघर्ष हे लाक्षणिक धरणे आंदोलन केले.