शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन; सत्ता स्थापनेनंतर कर्जमुक्ती
मायणी/कातरखटाव/खटाव – राज्यात आपले सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आत्महत्यांचा विचारही मनात आणू नका. पावसाळ्यातील महापूर आणि त्यानंतरच्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले असले तरी हेक्टरी 25 हजार रुपये भरपाई दिली जाईल. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वेगवान घडामोडी घडत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या खटाव तालुक्यात मायणी, कातरखटाव, खटाव व फलटणमधील नुकसानग्रस्त भागाचा आज दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची गाऱ्हाणी ऐकली. काही ठिकाणी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
त्यांच्यासमवेत विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना गटनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शेखर गोरे, धैर्यशील कदम, संतोष दुबळे, युवराज पाटील, हणमंत घाडगे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. खरीप हंगामातील मका, उडीद, बाजरी, मूग, कांदा ही हातातोंडाशी आलेली पिके व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. सावकारांची दारे ठोठावण्याची वेळ आमच्यावर आली आहे, अशा समस्या शेतकऱ्यांनी सांगितल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, पिकांचे नुकसान झाले म्हणून हताश होऊ नका.
आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे त्वरित सादर करावेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत देऊ. गावोगावी मदत केंद्रे उभारण्यात येतील. तेथे आपल्या समस्या मांडा. पीक विमा, कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधी, दुष्काळी अनुदान या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना मदत केंद्रांवर बोलावून याद्या तयार करून अधिकाऱ्यांनी त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात. त्यानंतर प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढू. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला कर्जमुक्तीचा शब्द दिला होता. सत्ता स्थापनेनंतर तो पूर्ण करीन.
उद्धव ठाकरे यांनी कातरखटाव येथे नामदेव बागल व दिगंबर बागल यांच्या शेतात पाहणी केली. त्या आधी मायणी, कलेढोण या भागातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष, डाळींब, पेरू बागा व ज्वारीच्या नुकसानीचीही पाहणी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी खटाव येथे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
चुकीचे पंचनामे केल्याने सरसकट कर्जमाफी द्यावी
शासकीय यंत्रणेमार्फत पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. खरीप हंगामातील मका, बाजरी, तूर, मूग आदी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या नुकसानीचे पंचनामे होईपर्यंत ती पिके कुजून गेली होती. त्यामुळे चुकीचे पंचनामे केल्याने फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र, सद्य स्थितीचा विचार करून आम्हा सर्वांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कणसेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.