गोरेंच्या प्रचारार्थ चाकणला प्रचारसभा
चाकण – निकामी हात आणि बंद पडलेली घड्याळे यापुढे अजिबात स्वीकारायची नाहीत, याशिवाय अपक्षांनाही नाकारा. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात नवी रोषणाई आणायची आहेत. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 18) चाकण येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. याप्रसंगी उमेदवार आमदार सुरेश गोरे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, सुलभा उबाळे, इरफान सय्यद, विजया शिंदे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, युवकांसाठी एक वर्षाची फेलोशिप, उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा करिता अडीच हजार बससेवा सुरू करणार आहोत. यावेळी अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, सुलभा उबाळे, इरफान सय्यद, शिवाजी वर्पे, प्रकाश वाडेकर, विजया शिंदे, आदींनी मार्गदर्शन केले.
उपस्थितांचा प्रतिसाद
ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा, असे आवाहन केले. नवामहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला. यावेळी नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेल्या गुन्हेगारीविरोधात आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याचे गोरे यांनी भाष्य करताच विराट जनसमुदायाने घोषणाबाजी करीत दाद दिली.
खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र, निवडणुकीनिमित्त गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नही.
-सुरेश गोरे, आमदार.