किल्ल्यावर छमछम करण्याची हौस असल्यास चौफुल्याला जा
हडपसर – 5 वर्षे सत्तेच्या काळात भाजप सरकार देशात आणि राज्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, नवीन उद्योग उभारणी, शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या प्रश्नांवर भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हाच नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्यात वारंवार 370 चा मुद्दा पुढे केला जात आहे. 370 चे स्वागत आम्हीही करतो, परंतु हिम्मत असेल तर 371 हेही रद्द करावे, असा तीव्र शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली.
हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, कमल ढोले-पाटील, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, प्रशांत जगताप, निलेश मगर, योगेश ससाणे, वैशाली बनकर, आनंद आलकुंटे, फारूक इनामदार, गफूरभाई पठाण, अनिस सुंडके, रईस सुंडके, प्रशांत तुपे, पूजा कोद्रे, हेमलता मगर, बंडू गायकवाड, आबा कापरे, सुनील बनकर, नारायण लोणकर, महेश शिंदे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी पुन्हा टीका केली. किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर, चौफुल्याला जा, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. तर पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं? फडणवीस साहेब हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे.
भाजपचा दावा आहे की, लोक आमच्या बाजूने आहेत. मग देशाचे पंतप्रधान सभा का घेतात, गृहमंत्री राज्यात सभा का घेत आहे? आणि असं असूनही आम्हाला विचारतात काय केल? शिवछत्रपतींचे स्मारक करतो हे सरकारने जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावलं, जलपूजन केलं आणि 5 वर्षांत वीटही उभारली नाही.