पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रचार दौऱ्यात आवाहन
कराड – कुणाला गटुळे देतो म्हणाले तर कुणाची चौकशी लावतो अशी भीती दाखवून अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतले. पण मला कोणी भीती दाखवू शकलेले नाही. कारण जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला स्वच्छ कारभार करता आला.
युती सरकारने चांगले काहीतरी केले असते, तर आम्ही कौतुक केले असते. पण त्यांनी लोकांच्या विकासात्मक कामाला बळ दिलेले नाही. असले हे निष्क्रिय सरकार घालवून या निवडणुकीत शेतकऱ्यांचे राज्य आणूया, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
तारुख (ता. कराड) परिसरातील वानरवाडी, चाळकेवाडी, बामणवाडी, पवारवाडी, शिबेवाडी व कुसूर, अंबवडे, आणे तसेच घारेवाडी येथील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीनिमित्त गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या पाच वर्षातील माझे सर्वाधिक मोठे काम म्हणजे वानरवाडीच्या तलावाची दुरुस्ती करण्यास निधी आणू शकलो. तलावाच्या कामामुळे या विभागातील बागायतीखालील क्षेत्र वाढेल. मला तुम्ही दिलेल्या आशीर्वादातून मी उतराई झालो आहे.
मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर कराडभोवतीचे सर्व रस्ते चौपदरीकरण केले. कराडमध्ये पायाभूत विकासकामे उभी केली. पण ही सर्व कामे नवख्या उमेदवारास करणे तितकेच कठीण आहे. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेला विकास मला साधता आला. केंद्रातून मी कराड-चिपळूण रेल्वेमार्गास मंजुरी आणली आहे. ते काम व कराड-ढेबेवाडी रस्ता चौपदरीकरण या कामांमुळे नक्कीच या विभागाची प्रगती आणखी गतीने होणार आहे.
चव्हाण यांनी वानरवाडी येथील शिवारात एका शेतात सुरु असलेल्या भुईमूग काढणीवेळच्या शेतकरी व महिलांशी थेट शेतात जाऊन संवाद साधला. यावेळी महिलांनी बाबांना आम्ही तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राज कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, कराड दक्षिण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष दत्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.