मुंबई : तीन चित्रपटांनी एका आठवड्यात १२० कोटींची कमाई केली, मग देशात मंदी आहे कुठे? असा अजब सवाल केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. या दाखल्यावरून पुन्हा राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
प्रसाद मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नुकतेच प्रदर्शित झालेले तीन चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत, मग देशात मंदी कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी 120 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
देशात बेरोजगारांना रोजगार मिळत आहे कारण देशाची अर्थव्यवस्था मजबूत पायांवर उभी आहे. मोबाईल उद्योग तर तेजीत आहे, असा दावा करत ते म्हणाले, मेट्रो आणि रस्तेबांधणीचे काम सुरू आहे. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे महगाईचा दर नियंत्रणात आहे.
सध्या एफडीआय सर्वात उच्चांकी स्तरावर आहे. सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा विकार दर कायम असून देशात मोबाईल उत्पादनांच्या 268 फॅक्टऱ्या कार्यरत आहेत. मेट्रोची आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. जनतेला रोजगार मिळत आहे. त्यामुळे देशात मंदी कुठे आहे, असे त्यांनी विचारले.
नोकऱ्या घटत असल्याची एनएसएसओने जारी केलेली आकडेवारी त्यांनी फेटाळून लावत देशात मंदी नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी त्यांनी ईपीएफच्या आकडेवारीचा दाखला दिला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत त्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे अनेक कारणे आहेत. त्या कारणांचा शोध घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे ते म्हणाले.