जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रंग भरायला लागले असले, तरी विकास हा मुख्य मुद्दा सोडून भावनिकतेच्या मुद्द्यांभोवतीच प्रचार फिरताना दिसत आहे. अर्थात प्रचाराचा हा पहिला टप्पा असला, तरी अजून कोणीच विकासाच्या मुद्द्यांना हात घातलेला दिसत नाही.
तालुुक्यातील विकासाशी थेट निगडित असलेली ही विधानसभेची निवडणूक तालुक्याच्या विकासाच्या मूळ मुद्द्यांवर लढली जावी, हे अपेक्षित आहे, अशी सर्वसामान्य जनतेचीही भावना आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचे मुद्दे कोणते असावेत, जनमताचा कानोसा पाहता, तालुक्यात बहुतांश गावांत, वस्त्यांना पाणी मिळत नाही. प्रत्येक वर्षी पाण्याच्या टॅंकरवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागते. सर्व गावांना पाणी मिळायला आणखी किती वर्षे लागणार, असा नागरिकांचा सवाल आहे.
उजनीच्या पाण्याचे रेंगाळलेले काम हा खरा जनतेच्या चिंतेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त रस्ते करणे म्हणजे विकास नाही, हे जनतेला समजायला लागले आहे. दोन्ही तालुक्यांत रोजगार, महिलांसाठी उद्योग, तरुणांना उच्च शिक्षणासाठी शाळा, कॉलेज, ग्रामीण भागातील जनतेसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लोकप्रतिनिधींना व विरोधकांनाही याचे काहीही वाटत नाही, ही शोकांतिका आहे.
या मुद्द्यांना सोडून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांची उणी-दुणी काढून भावनिक मुद्द्यांवर प्रचार करत असल्याचे दिसत आहे. तालुक्याचा दुष्काळी डाग कायमचा कधी पुसणार, उजनीच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, सुशिक्षित तरुणांचे नोकरीसाठी मुंबई, पुण्याला होणारे स्थलांतर कधी थांबणार, एमआयडीसीत उद्योग वाढीसाठी काय प्रयत्न होणार, तालुुक्यातील सर्वच रस्ते खड्डे मुक्त केव्हा होणार, डॉक्टर कोणीही असू द्या, मात्र गुण आला पाहिजे, हीच भावना आमच्या सारख्या मतदारांच्या डोक्यात आहे. आमदार कोणीही असो. परंतु तो विकास करणारा असायला पाहिजे, अशी नागरिकांची भावना आहे.