नगर – गणेशोत्सव म्हटलं की मंडप झालरी, कमानी असं उत्सवी स्वरूप आलंच. त्यातही हा उत्सव निवडणुकीच्या काळात आला तर राजकीय पक्ष, नेते, आणि त्या-त्या भागातील स्थानिक पुढारी आपल वर्चस्व दाखवून देण्याची संधी कशी दवडतील? आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत असल्याने गणेशोत्सवाचा वापर राजकीय पक्षांकडून आणि त्या-त्या भागातील पुढाऱ्यांकडून आपल्या प्रभावाची झलक दाखविणयासाठी केला गेला नाही तरच नवलच !
कोणत्या भागात कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे हे पाहण्यासाठी शहरातून एक फेरफटका मारला तरी सहज नजरेस पडणाऱ्या विविध मंडळांच्या कमानी झालरी पाहून त्या भागात कोणाचा प्रभाव आहे हे शाळकरी पोरं सुद्धा सहज सांगू शकेल. ज्या भागात शिवसेनेचा जोर आहे तेथील कमानी झालरी भगव्या रंगाच्या तर जेथे भाजपाचा प्रभाव आहे तेथे भाजपाच्या झेंड्याच्या रंगसंगतीतील कमानी झालरी दिसतात, जेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव आहे तेथे तिरंगी झालरी कमानी नजरेस पडतात. त्यावरून त्या भागात कोणाचा प्रभाव किती हे सहजगत्या लक्षात येते. हा झाला पक्षीय प्रभावाचा मुद्दा. त्यानंतर येतो तो स्थानिक पुढाऱ्याच्या प्रभावाचा मुद्दा.त्या भागातील प्रभावी पुढाऱ्याची म्हणजेच भाऊ, भैय्या, दादा, काका यांच्या पैकीच कोणाच्या तरी नावाचा उल्लेख असलेल्या घोषणांचे फलक ठिकठिकाणी लावलेल्या असतात आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसात त्या-त्या पुढाऱ्याची छवी पोस्टरद्वारे मंडपाच्या खांबाची शोभा वाढवितात.