नगर – भाजपा देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे. निवडणुकीची तयारी करण्यासाठी आम्ही नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेत असून जे कोणी बाहेरून पक्षातून येतील त्यांच्या सुद्धा मुलाखती घेऊ.तसेच जे पक्ष सोडून गेले होते अगर त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या असे भरकटलेले कार्यकर्ते परत पक्षात येणार असतील तर त्यांना सुधारण्याची संधी देवू असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भामध्ये निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील आम्हाला त्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही अशी स्पष्टोक्ती सुद्धा त्यांनी दिली.
नगर येथे भाजपच्या मुलाखतीच्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बबनराव पाचपुते, सरचिटणीस श्याम पिंपळे, प्रसाद ढोकरीकर, प्रकाश चित्ते आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार आंबटकर म्हणाले की, शिवसेना-भाजप युती संदर्भातला निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे आम्हाला विक्रीबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपा हा देशामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही सर्वत्र निवडणूक लढवताना प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतो. त्या दृष्टिकोनातूनच नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेत आहोत. एक प्रकारे उमेदवारांची तयारी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.