न्हावरे प्रतिनिधी – धरणक्षेत्रात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून,नदीपात्राच्या बाहेर पाणी वाहू लागले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात व विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वडगाव रासाई व मांडवगण फराटा येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच नदीचे पाणी ओढ्यांमधून गावाच्या मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झालेली आहे.
परिसरातील मांडवगण फराटा येथून शिरसगाव काटा,आंधळगाव, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव खालसा या गावांकडे जाणारे रस्ते,रस्त्यांवर पाणी आल्यामुळे बंद झालेले आहेत. मांडवगण फराटा गावातील चंदन नगर, लमाण वस्ती, नाईक वाडा या परिसरातील अनेक घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याने घरातील धान्य तसेच इतर चीजवस्तू पाण्याने भिजल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हा परिषदेने मांडवगण या ठिकाणी नुकतीच पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधली आहे.या इमारतीतही पाणी शिरले आहे. मात्र पाणी शिरण्या आगोदर या इमारतीतील सुमारे 50 लाख रुपये किमतीचे दवाखान्याचे साहित्य,पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ते साहित्य बाहेर काढले. त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान टळले आहे.
भीमा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कालपासून भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावांना व पूररेषेच्या आत वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील ओढ्यांच्या पाण्यात मोठी वाढ होऊन रस्त्यांवरील छोट्या पुलांवर पाणी येऊन दळणवळण पूर्ण बंद झाले आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
काल सकाळपासूनच भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. नदीकाठावरील आपल्या विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. येथील अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात ज्यांची घरे बुडाले आहेत अशा ग्रामस्थांची येथील प्राथमिक शाळेत तसेच श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
अशीच परिस्थिती वडगाव रासाई व नागरगाव येथीलही आहे. वडगाव येथील नदी पत्रातील रासाई देवीचे मंदीर पाण्याखाली गेले असून, बाजार मैदानात पाणी पुराचे पाणी आले आहे.तसेच जुन्या नागरगाव पर्यंत पाणी आले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.त्यामुळे नागरगावच्या अनेक नागरिकांनी 1997 साली असाच पूर आला असल्याच्या आठवणी सांगितल्या.