तळेगाव दाभाडे – तळेगाव स्टेशन भागात पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणी नदीपात्र जलपर्णीने पूर्ण वेढले आहे. सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस जलपर्णीमध्ये वाढ होत आहे. तळेगाव स्टेशन भागातील यशवंत नगर व परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातून पिण्यासाठी पाणी घेतले जाते. या पिण्याच्या पाण्यावर तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. परंतु ज्या ठिकाणी पाणी जॅकवेलच्या माध्यमातून उचलले जाते त्या परिसराला पूर्णतः जलपर्णीने वेढा दिला आहे.
इंद्रायणी नदीमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता कंपन्यांकडून रासायनिक पाणी, सांडपाणी सोडले जाते. सांडपाण्यामुळे जलपर्णीची वाढ इतर वनस्पतींच्या तुलनेत तिप्पट वेगाने होते. यामुळे नदीचे पाणी काळपट होऊन त्यातून उग्र वास येतो. तसेच पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन जलचरणाचे जीवन धोक्यात येते. हेच पाणी प्रक्रिया करून तळेगावकरांना देत आहोत.
जलपर्णीच्या वाढीमुळे आसपासच्या वस्तीत डास, दुर्गंधी आदींचा त्रास होत आहे. यामुळे रोगराई पसण्याची शक्यता आहे. नदीमध्ये सांडपाणी सोडणा–यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिक मत व्यक्त करत आहे.
तळेगाव हद्दीतील दुषित पाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून २.४ एमएलटीच्या एसटीपी प्लँटचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन कार्यान्वित होईल.
– एन. के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद