देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू गावठाण परिसर, धर्मवीर संभाजी महाराज चौक, महाद्वार चौक, १४ टाळकरी कमान, मुख्य नगरपंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य प्रवेशद्वार, देहू–आळंदी रस्ता, परंडवाल चौकामध्ये पथारीधारक, लघु विक्रेत्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण करीत दुकाने थाटली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्वच पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. शासनाने भाविकांसाठी लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार केले आहेत. सर्वच पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पदपथ जणू फेरीवाल्यांसाठीच बनवले आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पथारीधारकांनी लोखंडी स्टॅन्ड व छत्र्यांनी जागा अडविली आहे. फेरीवाल्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नगरपंचायत त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरच झालेल्या अतिक्रमणामुळे तासंतास नित्याची होणारी वाहतूक कोंडी पादचाऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. अपघात, भांडणे, मोबाईल चोऱ्या, पाकीटमार, दागिने हिसकावण्याच्या अनेक घटनाही घडताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.