पिंपरी – आजच्या डिजिटल युगात खूप कमी नागरिक रोखीने व्यवहार करतात. परंतु पीएमपीच्या बाबतीत मात्र चित्र पूर्णपणे उलट दिसून येत आहे. रोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत कॅशलेस पेमेंट व्यवस्थेला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या रोज दहा ते बारा लाख इतकी आहे. परंतु संपूर्ण डिसेंबर महिन्यात मिळून केवळ चार लाख ३१ हजार प्रवाशांनी यूपीआयद्वारे तिकीट काढले आहे. याचा अर्थ की प्रवासी संख्येच्या दोन टक्के प्रवासी देखील कॅशलेस सुविधेचा वापर करुन घेऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे. याकडे पीएमपी प्रशासनाने खूपच गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
अनेकदा वाहक मशीन खराब आहे, नेटवर्क नाही, अशी उत्तरे देऊन रोख पैसे मागत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहे. तर दुसरीकडे पीएमपी प्रशासनाचे अधिकारी मात्र यंत्रणा उत्तम असून ट्रान्झेक्शन फेल होण्याचे प्रमाण अवघा एक टक्का असल्याचे सांगत आहेत. मग वाहकांना कॅशलेसशी काय वावडे आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रवासी आणि वाहक यांच्यतील रोजच्या सुट्या पैशांची कटकट मिटावी, या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांसाठी कॅशलेस सुविधा (युपीआयंद्वारे पेंमेट) सुरू केली आहे. आॅक्टोबरमध्ये एक लाख ५४ हजार प्रवाशांनी युपीआयच्या माध्यमातून तिकीट काढले होते. तर, डिसेंबर महिन्यात त्यात वाढ होत संख्या चार लाख ३१ हजार १३९ झाली आहे.
पीएमपीच्या साधारण १७०० बस रोज मार्गावर धावतात. त्यामधून दिवसाला साधारण १० ते १२ लाखांच्या जवळपास प्रवासी प्रवास करतात. त्याच्या माध्यमातून पीएमपीला साधारण दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, प्रवास करताना रोजच वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्या पैशांवरून वाद होतात. त्याला पर्याय म्हणून कॅशलेस सुविधा, डिजिटल पेमेंटची सुविधा मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये एक लाख ५४ हजार प्रवाशांनी युपीआयच्या माध्यमातून तिकीट काढले होते. तर, डिसेंबर महिन्यात त्यात वाढ होत चार संख्या चार लाख ३१ हजार १३९ झाली आहे
यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार न होण्याचे प्रमाण केवळ एक टक्का इतके आहे. तांत्रिक अडचणी फारशा नाहीत. प्रवाशांनी युपीआयचाच वापर करावा. वाहक जर चुकीची माहिती देत असतील तर तक्रार करावी.
– विजय रांजणे, वाहतूक नियोजन अधिकारी, आयटी, पीएमपी.