पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आठ हजारांहून अधिक कंपन्या आहेत. त्यापैकी बहुतांशी कंपन्या एमआयडीसीच्या अखत्यारित येतात. मात्र येथील कंपन्यांमध्ये लागलेली आग शमविण्यासाठी एमआयडीसीची अग्निशामक यंत्रणाच नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशामक विभाग येथील आग शमविण्याचे काम करीत आहे. मात्र या दोन्ही अग्निशामक विभागाकडे येथील धोकादायक रासायनिक कंपन्यांबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही.
पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. 1963 मध्ये शहरात एमआयडीसी स्थापन करण्यात आली. शहरात आजमितीला 50 मोठ्या कंपन्या आहेत. तर मध्यम उद्योगांची संख्या जवळपास एक हजारांच्या आसपास आहे. तर या उद्योगांवर अवलंबून असणारे सुमारे सात हजार सूक्ष्म उद्योग आहेत. एमआयडीसीमध्ये कोणतीही नवीन कंपनी सुरू करायची असल्यास त्यास एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाकडून “ना-हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. दरवर्षी कंपनीला वर्षातून दोनवेळा अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचा बी फार्म भरून द्यावा लागतो. दिलेली माहिती खरी आहे की खोटी याबाबत एमआयडीसी अग्निशामक विभागाकडून कोणतीही खातरजमा केली जात नाही.
एमआयडीसीची तीन अग्निशामक केंद्रे
पिंपरी चिंचवड शहराच्या आसपास हिंजवडी, चाकण आणि तळेगाव येथे एमआयडीसीची अग्निशामक केंद्र आहेत. यापैकी सर्वात जवळचे चाकण आहे. एमआयडीसी पासून अग्निशामक केंद्राचे अंतर 14 किलोमीटर असून त्यांना शहरात येण्यासाठी किमान 25 मिनिटांचा वेळ लागतो. हिंजवडी अग्निशामक केंद्र शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असून त्यांना एमआयडीसीत येण्यासाठी 42 मिनिटे लागतात. सध्याची वाहतूक कोंडी पाहता आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. तर तळेगाव अग्निशामक केंद्र एमआयडीसी पासून 32 किलोमीटर अंतरावर असून त्यांना शहरात येण्यासाठी किमान 50 मिनिटे लागतात.
अग्निशामकच्या जागेवर महापालिकेचा कब्जा
एमआयडीसीने अग्निशामक केंद्रासाठी दिलेली जागा सपाट करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आता ही जागा महापालिकेने एसआरए स्कीममधील नागरिकांना राहण्यासाठी दिली आहे. जोपर्यंत एसआरए मधील नागरिकांना घरे मिळत नाहीत तोपर्यंत येथील जागा रिकामी होणार नाही.
रासायनिक कंपन्यांबाबत अग्निशामक अनभिज्ञ
शहरात किती धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत याबाबत एमआयडीसी अग्निशामक दल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे माहितीच नाही. रासायनिक कंपन्यांची आग क्षणार्धात भडकते. अशावेळी एमआयडीचीच्या अग्निशामक विभागाला घटनास्थळी पोचण्यास किमान 25 मिनिटांचा अवधी लागला तर तोपर्यंत कंपनी भस्मसात होऊ शकते.
असा काढला एमआयडीसीने पर्याय
पिंपरी चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये लागलेली आग सध्या महापालिकेचा अग्निशामक विभाग शमवत आहे. यामुळे एमआयडीसीने यशवंतनगर, पिंपरी येथे एक एकर जागा पिंपरी चिंचवड महापालिकेला अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी दिली आहे.
असा होऊ शकतो धोका एमआयडीसीच्या जे
ब्लॉकमधील कंपनीला लागलेली आग शमविण्यासाठी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे सहा बंब गेले होते. त्यावेळी कंपनीत 47.5 किलो वजनाचे विनापरवाना साठा केलेले तब्बल 44 एलपीजी गॅस सिलिंडर आढळून आले. जर आग शमविताना गॅसचा स्फोट झाला असता तर अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असता.