इंदूर – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अखेर कठोर निर्णय घेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला संघातून वगळले. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. तसेच संघात दुसरा बदल करताना वेगवान गोलंदाज महंमद शमीला विश्रांती देताना उमेश यादवला संघात स्थान दिले आहे.
राहुल गेल्या काही मोसमांपासून सातत्याने अपयशी ठरत होता. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्याला सातत्याने अपयश येत होते. तरीही त्याचे संघातील स्थान पक्के राहिल्यामुळे त्याच्यासह कर्णधार रोहित, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समिती व बीसीसीआय या सगळ्यांवरच प्रचंड टीका होत होती. राहुलकडे संघाचे उपकर्णधारपद असल्याने त्याला थेट काढताही येत नव्हते, त्यामुळे त्याच्याकडची जबाबदारी आधी काढली गेली व त्यानंतर त्यालाही संघातून बाहेर काढले आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
आता या कसोटीसह चौथी कसोटी टिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कलामीची सरस कामगिरी करावी लागणार आहे. त्यातच भारतीय संघाने या दोनपैकी एक कसोटी जरी जिंकली तरीही त्यांचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान अधिक बळकट होणार आहे. त्यामुळेच हा कसोटी सामना त्या अंतिम सामन्याची रंगीत तालीम ठरणार आहे.
#NZvENG 2nd Test : न्यूझीलंडचा इंग्लंडवर अवघ्या एका धावेने विजय
शमीला सातत्याने खेळवले जात असल्याने तो थकला होता व म्हणूनच त्याला विश्रांती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्याला दुखापतही झाल्याचे बोलले गेले असले तरीही कोणती दुखापत झाली ते मात्र सांगितले गेलेले नाही. ऑस्ट्रेलिया संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. कौटुंबिक कारणाने मायदशी परतलेल्या नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या जागी मिचेल स्टार्कला तर दुखापतीने त्रस्त असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी कॅमेरुन ग्रीनला संधी देण्यात आली आहे.