सिंहगडरस्ता, दि.20 (प्रतिनिधी) – सिंहगड रस्त्यावर काही दिवसांपूर्वी महावितरणाच्या डीपीचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका शाळकरी मुलाचा सोसायटीच्या आवारात वीज वायरचा धक्का बसून मृत्यू झाला होता.
एकीकडे अशा घटनांत वाढ होत असताना उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. दरम्यान, याबाबत संपर्क साधला असता महावितरणचे अधिकारी बोलायला तयार नाही. शहरात सातत्याने विजेच्या संबंधित अपघात होत आहेत. त्यात मोठ्या संख्येने मनुष्य व प्राणी यांचे बळी गेल्यानंतरही महावितरणचा कारभार मात्र सुधारलेला नाही. अनेक ठिकाणी विजेतारा लोंबकळत असतात. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही.
याच विषयावरून काही नागरिकांनी माहिती अधिकारात विचारणा केली असता, “वीज वाहिनीच्या तारा, डीपी आदी ठिकाणी शॉक लागून गेल्या दहा वर्षांत राज्यभरात 5,466 व्यक्तींचा व 8,064 प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.’ त्यामुळे महावितरण कंपनीने त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त होत आहे.
वीज अपघातांची कारणे
पाऊस व वादळात वीजतारा तुटून पडणे. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा तारांना स्पर्श
डीपी उघडे, विद्युत खांबात करंट असणे.
भूमिगत वायरचे कामनियमानुसार नसणे.
सध्या सिंहगड रस्ता परिसरात उघड्यावर असलेले डीपी, ट्रान्सफॉर्मर, वायर यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. परिसरातील धोकादायक वीज यंत्रणांची माहिती महावितरणला देऊनही काही उपाययोजना ते करत नाहीत. या विषयावर आंदोलन केले जाईल.
– अतुल चाकणकर, अध्यक्ष, भाजप ओबीसी सेल, खडकवासला