अहमदाबाद – माजी कर्णधार विराट कोहली व नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही. हा केवळ एक खोडसाळपणा असून विनाकारण संघाचे मनोबल खच्ची करण्याचाच हेतू यातून दिसून येत आहे, अशा शब्दात विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी माध्यमांसह बीसीसीआयमधील काही कळीच्या नारदांना फटकारले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने खिलाडूवृत्तीनेच रोहितला काही सल्ले दिले. कोहलीव रोहित यांच्यामध्ये मोठा वाद असल्याचे सातत्याने म्हटले जात आहे. मात्र, हे सर्व निरर्थक असून हे दोघेही व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना पुढे काय करायचे आहे ते नेमके ठाऊक आहे. या दोघांनाही सत्य काय आहे, हे माहिती आहे.
भारतीय संघात असा कोणताही खेळाडू नसेल की जो संघाच्या हिताचा विचार करत नसेल. जर एखाद्या खेळाडूने धावा केल्या नाहीत किंवा बळी घेतले नाहीत तर त्याला संघाबाहेर काढण्यात येऊ शकते आणि हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वाद असल्याच्या फक्त अफवाच आहेत, असे गावसकर यांनी सांगितले.
कोहलीकडे कर्णधारपद नाही म्हणून तो रोहितला सहकार्य करणार नाही असे वृत्तही दिले गेले मात्र, त्यात काहीही अर्थ नाही. अशा बातम्या जे कोण पसरवतात त्यांची किव येते, असेही गावसकर म्हणाले.