अहमदाबाद – भारताचा उपकर्णधार लोकेश राहुल व सलामीवीर मयंक आग्रवाल वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी करोनातून पूर्ण बरे झाले नसल्याने शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याचे समोर आले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. राहुलने कौटुंबीक कारणाने या सामन्यातून माघार घेतली होती.
तर मयंक विलगीकरणाच्या नियमांमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, आता हे दोघेही संघनिवडीसाठी उपलब्ध असल्याने कर्णधार रोहित शर्माला राहुलला संधी देऊ शकतो.
धवन, श्रेयस आणि ऋतुराज यांना गेल्या आठवड्यात करोनाची बाधा झाल्यामुळे पहिल्या लढतीला मुकावे लागले. त्याच्या जागी इशान किशन आणि शाहरूख खान यांचा भारताच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.