मुंबई – राज्यात करोनाचा कहर सुरु असून ठाकरे सरकरकडून लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहे. राजकीय पक्षासोबत प्रसिद्ध उद्योजकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले कि, वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणे यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाऊन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे.
लॉकडाऊन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसे निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासानंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागते, असेही टोपेंनी सांगितले.
आपण देशात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण आपल्याला गती वाढवायची आहे. पात्र लोकांच्या लसीकरणासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. सामाजिक आणि राजकीय संघटनाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर नेत मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच धर्तीवर आपण आपल्या ४५ वर्षापुढील लोकांना बाहेर काढून लसीकरण केलं पाहिजे. यामुळे गती वाढेल असा मला विश्वास आहे. आपलं देशप्रेम, राज्यप्रेम सिद्ध करावं, असे आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.